मोठी बातमी! उद्धव ठाकरे गटाकडून 288 जागा स्वबळावर लढण्याची तयारी?
मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून तिढा कायम आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद वाढत असल्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडने दिल्लीत आपल्या नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाने 288 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू असतानाच काही जागांवर वाद निर्माण झाला आहे. या वादांवर तोडगा काढण्यासाठी तिन्ही पक्षांकडून प्रयत्न चालू आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर एक महत्वाची बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागांसाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाकरे गटाची रणनीती
जागावाटपावरून काँग्रेससोबत वैचारिक मतभेद असल्यामुळे ठाकरे गटाने "प्लॅन A" आणि "प्लॅन B" तयार केले आहेत. काँग्रेससोबत आल्यास निवडणूक त्यांच्यासोबत लढवली जाईल, अन्यथा काँग्रेसच्या मदतीशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. ठाकरे गटाची रणनीती आक्रमकतेने निवडणुकीत उतरण्याची आहे, असे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसच्या दिल्लीत चर्चा
राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सध्या दिल्लीत आहेत, जिथे उमेदवारांची यादी निश्चित करण्यात येत आहे. त्याचवेळी, जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गटासोबत सुरू असलेल्या वादावर काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठी आणि राज्यातील नेत्यांमध्ये चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाच्या आडमुठ्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या सर्व घटनाक्रमामुळे राज्याच्या राजकारणात ताण निर्माण झाला आहे, आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची स्वबळावर जाण्याची तयारी त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.




Comments (0)
Facebook Comments (0)